हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधे ८ लहान मुलं आणि ६ महिलांचा समावेश आहे. गजबजलेल्या परिसरातल्या या दुमजली इमारतीत शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ८ जणांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, तर ९ जण उपचारादरम्यान मरण पावले.
केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली तसंच पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. तेलंगण सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथे आज पहाटे एका कापड कारखान्याला लागलेल्या आगीत ८ जण मरण पावले आहेत. अक्कलकोट मार्गावरच्या एमआयडीसी परिसरात हा कारखाना आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आणि संध्याकाळी साडे पाचच्या सुमाराला ही आग आटोक्यात आणली. या आगीत या कारखान्याचे मालक, त्यांचं कुटुंब आणि कामगार अशा ८ जणांचा मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीतून तीन जणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.