सर्व स्वरूपातल्या दहशतवादाविरोधात लढा अधिक बळकट करण्याचं आवाहन भारतानं जागतिक समुदायाला केलं आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत माध्यमप्रतिनिधींना सांगितलं की, प्रत्येक देशानं सीमापार दहशतवादाचा निकरानं मुकाबला केला पाहिजे. ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना आणि इतर कोणत्याही मंचावर संमत झालेल्या सर्व ठरावांमधे दहशातवादाचा कडाडून विरोध असला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. नेपाळमधे सुशीला कार्की यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाल्याचं भारताने स्वागत केलं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्की यांच्याशी संवाद साधला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
लोकशाहीवादी शेजारी म्हणून नेपाळ आणि भारताचं सहकार्य कायम राहील असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं जयस्वाल म्हणाले. ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानचं नुकसान झाल्याची माहिती देणारी चित्रफीत व्हायर झाल्याबद्दल पत्रकारांनी छेडलं असता जयस्वाल म्हणाले, पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि दहशतवादी यांच्यातले संबंध साऱ्या जगाला माहित आहेत.
 
									