भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं.
या कार्यक्रमात त्यांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजनेचाही प्रारंभ केला. खासगी क्षेत्राकडून संचलित केल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमत्र्यांनी सांगितलं.
शिक्षणतज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधल्या ३ हजारांपेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. यामध्ये भाषणं, पॅनेल चर्चा, सादरीकरणं आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनं आयोजित केली जातील. देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरेल.