गेल्या पाच वर्षांत जागतिक पातळीवर वीज उत्पादन करणारा भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. चीन आणि अमेरिका हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.व्यावसायिक आणि घरांमध्ये वापरले जाणारे वातानुकुलन यंत्र तसंच इतर विद्युत उपकरणांचा वाढता वापर तसंच उद्योगक्षेत्राकडून वाढत्या विजेच्या मागणीमुळेही उत्पादनात वाढ झाल्याचं आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था -IEA च्या अहवालात नमूद केलं आहे.
याप्रमाणेच नवीकरणीय ऊर्जेचा वापर आणि त्याला मिळणारा वाढता प्रतिसादामुळेही वीज उत्पादन वाढीचं कारण असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. विशेषतः सौरऊर्जा प्रकल्प गुंतवणुकीत लक्षणीय वाढ, स्वच्छ ऊर्जेतील गुंतवणुकीत भरीव वाढ झाल्याचंही IEA नं म्हटलं आहे. भारत सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे देशात वीज उत्पादनात झपाट्यानं वाढ झाल्याचं निरीक्षण अहवालात मांडलं आहे.