ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने देशभरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केला असून, सहा राज्यांमधल्या १३ शहरांमध्ये जवळपास १५ ठिकाणांवर छापे टाकले. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले.
ही टोळी बनावट ईमेल खात्यांचा वापर करून तसंच अधिकृत सरकारी डोमेनची हुबेहूब नक्कल करून नोकरीचं बनावट पत्र पाठवत होती. यावर विश्वास बसावा यासाठी काही जणांना सुरुवातीचे दोन ते तीन महिने पगारही देण्यात आल्याचं ईडीने म्हटलं आहे. आधी हा घोटाळा भारतीय रेल्वे विभागाच्या नावाने सुरू असल्याचं उघडकीला आलं होतं. मात्र, त्यानंतर वनविभाग, टपाल, प्राप्तिकर, उच्च न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह ४०पेक्षा जास्त सरकारी संस्था आणि विभागांच्या नावाने हा घोटाळा सुरू असल्याचं ईडीला आपल्या तपासात आढळून आलं.