भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ‘खुला बाजार विक्री योजने’ अंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे. तांदळाचा साठा खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी अन्न महामंडळाचा ई-लिलाव सेवा प्रदाता, असलेल्या एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडकडे स्वतःची नोंदणी करावी आणि उपलब्ध साठ्यासाठी बोली लावावी, असं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी तांदळाचा ई-लिलाव होणार असून, यासाठी एकूण १० हजार मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध केला जाईल असं यात म्हटलं आहे.
तांदळासाठी किमान बोली १ मेट्रिक टन, तर प्रति बोलीदार ७,००० मेट्रिक टन इतकं प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे.
अन्नधान्याच्या वाढत्या बाजारभावांवर नियंत्रण ठेवणं आणि खुल्या बाजारात पुरेशी उपलब्धता निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं, हे ‘खुला बाजार विक्री’ योजनेचं उद्दिष्ट आहे.