तंटानिवारणासाठी मध्यस्थी हा प्रभावी पर्याय असून पंचायतीच्या स्वरुपात भारतात ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयातर्फे लवाद आणि मध्यस्थीसंदर्भात आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
गावखेड्यांपर्यंत तंटे सोडवण्याचं कार्य शांततापूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात करता यावं याकरता अशी पर्यायी न्यायदान व्यवस्था आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, भावी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.