तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रालोआ सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताचं स्थान बळकट झालं आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.
तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या वापराचे असंख्य फायदे झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणामुळे रोजगारांच्या संधी उपलब्ध होणं, प्रशासनाच्या उपलब्धतेत सुलभता आणि पारदर्शकता निर्माण होणं, सेवा वितरणाची प्रक्रिया सुलभ होणं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करण्यात डिजिटल इंडिया उपक्रमाचा मोठा वाटा आहे. दुर्गम भागात पोहोचलेल्या इंटरनेट सेवेपासून ते रिअल टाईम डिजिटल पेमेंटपर्यंत भारतात झालेलं परिवर्तन उल्लेखनीय आहे. डिजिटल इंडियाची ११ वर्षं ही समावेशक वाढ, नवोन्मेष आणि डिजिटल महासत्ता म्हणून भारताच्या उदयाची कहाणी आहे.