२०४७ सालापर्यंत विकसित देश बनण्याचं भारताचं ध्येय असून, ते साध्य करण्यामध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते केरळमध्ये आयआयटी पलक्कड च्या ७ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
विद्यार्थ्यांनी वाहतूक, गृहनिर्माण, वैद्यकीय सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जागतिक डिजिटल विश्वात भारताचं वाढतं अस्तित्व लक्षात घेता, देशभरात समावेशक आणि नैतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं.
आयआयटी पलक्कड विकसित भारताच्या उद्दिष्टामध्ये योगदान देण्यासाठी वचनबद्ध असून, त्या दिशेने प्रवास करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.