आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे. सर्वत्र जय हरी विठ्ठल आणि पांडुरंग हरीचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या. विठूमाऊली आपल्या समाजाला आनंदाची आणि समृद्धीची वाट दाखवेल, अशी भावना त्यांनी समजामाध्यमावर व्यक्त केली. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. पांडुरंगानं राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं त्यांनी विठ्ठलाला घातलं. सर्व विठ्ठलभक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दांपत्याचा सन्मान, तसंच स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा श्रीविठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. मुंबईत वडाळ्याच्या प्रती पंढरपूर असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठुरायाची पूजा केली. यावेळी शिंदे यांनी मंदिराच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी मंजूर केलेल्या २५ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल, असं सांगितलं.
Site Admin | July 6, 2025 8:22 PM | Aashadhi Ekadashi | Pandharpur
आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिमय वातावरण
