शेती म्हणजे संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं देशात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं उदघाटन, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या कष्टाला कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसंच नवोन्मेष आणि संशोधनाचा लाभ मिळावा यासाठी राज्यसरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांनीही या उपक्रमांमध्ये स्वतः सहभागी होऊन नवीन गोष्टींची माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार शेतीत बदल करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. नवीन पिढीला कृषीक्षेत्रात नवीन संशोधन करता यावं यासाठी राज्यातल्या सहा विभागांमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.