मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून, जपान प्रमाणे, भारतही भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी ‘मेक इन इंडिया’ महत्वाचं असून ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशवासीयांनी या मोहिमेचं यश अनुभवल्याचं ते यावेळी म्हणाले.
संपूर्ण जगात आज अनिश्चिततेचं वातावरण असून, विश्वासाचा अभाव हे त्याचं मूळ कारण आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे विविध प्रदेश, समुदाय आणि आर्थिक घटकांमध्ये विश्वासाचं मजबूत वातावरण निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.