आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूर मधल्या वायुसेनेच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली तसंच या प्रतिहल्ल्याचं देशभरात आणि जागतिक स्तरावर कौतुक होत आहे, असं ते म्हणाले.
पाकिस्तानशी केलेली शस्त्रसंधी म्हणजे लष्करी कारवाईचा पूर्णविराम नसून केवळ अल्पविराम आहे, वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर जसं पोलीस लक्ष ठेवून असतात त्याचप्रमाणे आम्ही पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहोत आणि पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केल्यास त्याला आपलं सैन्यदल धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला.
राजनाथ सिंह आज भारत-पाकिस्तान सीमा प्रदेशालाही भेट देणार आहेत. यावेळी ते भारतीय लष्कराच्या तयारीचं परीक्षण करतील. भारत-पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्तानं भुज वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संरक्षण मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.