खताच्या लिंकिंगबाबत कायदा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाचं चित्र बदलण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरु असलेल्या कामांचाही पवार यांनी आढावा घेतला. या कामासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असून, निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. या विकास आराखड्यात २८६ कोटी ६८ लाख रूपयांच्या ९२ विकास कामांना मान्यता दिल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.
परळी औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आवश्यक सोयीसुविधांचा, तसंच अहिल्यानगर – बीड – परळी रेल्वेमार्गाचाही पवार यांनी आढावा घेतला.