बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ‘मोंथा’ चक्रीवादळ आज अधिक तीव्र झालं असून ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगानं ते आज मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात मछलीपट्टण ते कलिंगपट्टणच्या दरम्यान थडकण्याची शक्यता आहे.
श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, पूर्व गोदावरी, कोनासीमा, काकीनाडा, कृष्णा, नेल्लोर आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत आणि अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक रेल्वे आणि विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि केंद्रीय मदतीचं आश्वासन दिलं.
आतापर्यंत ३५ हजाराहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. दक्षिण मध्य पूर्व किनारी रेल्वे आणि विविध विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि विशेष पथकं बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.
दक्षिण ओडिशाचा किनारी भाग आणि छत्तीसगडला उद्यापर्यंत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओडीशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
या परिस्थितीच्या अनुषंगानं ओडीशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज भुवनेश्वरमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील दक्षिणेकडील आणि किनारी जिल्ह्यांमध्ये अग्निशमन सेवा, ओडिशा आपत्ती जलद कृती दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.