भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा संघ ९७ धावांनी पिछाडीवर आहे.
आज सकाळी तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा पाहुण्या संघानं कालच्या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ गडगडल्यानं जेवणाच्या विश्रांतीपूर्वी त्यांना फॉलोऑन मिळाला. त्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडिज संघाची अडखळत सुरुवात झाली. चहापानापर्यंत वेस्ट इंडिजची अवस्था २ बाद ३५ झाली होती. मात्र त्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी अर्धशतक झळकावत संघाला सुस्थितीत नेलं. आज दिवस अखेर खेळ संपला तेव्हा या दोघांनी केलेल्या १३८ धावांच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजच्या संघाच्या दोन बाद १७३ धावा झाल्या. सध्या वेस्ट इंडिजचा संघ ९७ धावांनी पिछाडीवर आहे.
कुलदीप यादव यानं ८२ धावांत ५ बळी घेत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. कुलदीप यादवनं केवळ १५ कसोटी सामन्यांत ५ वेळा पाच बळी घेत जागतिक विक्रम रचला आहे. रवींद्र जडेजानं ३ तर मोहम्मद सिराज आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.