भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकतेल्या, ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सातव्या षटकातच कर्णधार आणि सलामीवर शुभमन गील ९ धावांवर, तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार रोहीत शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला.
रोहीत ७३ तर श्रेयस ६१ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल यानंही ४४ धावांचं मोलाचं योगदान दिलं.
ऑस्ट्रेलियाच्या वतीनं ॲडम झाम्पा यानं ४, बार्टलेट यानं ३, तर मिशेल स्टार्क यानं २ गडी बाद केले.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या षटकात बिनबाद ४ धावा झाल्या होत्या.
मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला आहे, तर तिसरा सामना येत्या २५ तारखेला सिडनी इथं होणार आहे.