केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूर केलेल्या निर्यातदारांसाठीच्या पत हमी योजनेमुळे स्पर्धात्मकता वाढेल, व्यवसाय सुलभ होईल आणि भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. यात त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. निर्यात प्रोत्साहन अभियानामुळे स्पर्धात्मकता वाढेल, लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना, प्रथमच निर्यात करणाऱ्यांना तसंच कामगार केंद्रित क्षेत्रांना मदत होईल, असं प्रधानमंत्री म्हणाले. खनिजांसाठी रॉयल्टी दरांचं सुसूत्रीकरण केल्यामुळे शाश्वतता आणि स्वावंलबन वाढीस लागेल, यामुळे पुरवठा साखळी मजबूत होईल, आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात निर्यातदारांसाठी नवीन पत हमी योजनेला मंजूर देण्यात आली. या योजने अंतर्गत २० हजार कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज दिलं जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. याशिवाय सिझियम, ग्रेफाइट, रुबिडियम आणि झिरकोनियम या खनिजांसाठी रॉयल्टी दरांचं सुसूत्रीकरण करणं तसंच, २५ हजार ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या निर्यात प्रोत्साहन अभियानाला मंजुरी देण्यात आली. याबद्दल अश्विनी वैष्णव म्हणाले.
दिल्लीमधल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकार कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही, असं वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.