काँग्रेसच्या पक्ष संघटनेत यापुढे जनाधार असणाऱ्यांना संधी देणार असल्याचं काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केलं. ते आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष पदग्रहण समारंभात बोलत होते.
काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवून संघटना मजबूत करणं हेच आपलं ध्येय आहे. कामाची पद्धत बदलायची आहे. बदललेली लढाई समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं लढाई लढली पाहिजे. कार्यकर्ता लढाऊ बनवायचा आहे. त्यादृष्टीनं येत्या २५ तारखेनंतर पुढचं धोरण ठरवून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात इत्यादी काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यकारणीत फेरबदल होणार आहेत. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असं आवाहन चेनीथला यांनी केलं.