पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे. या मुद्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजमाध्यमांवर केली, तसंच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी तटस्थ मंचाचा उल्लेख केला या विषयी त्यांनी आक्षेप घेतला असून सिमला करार डावलण्यात तर येत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला आहे.