‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी गावांमध्ये १७ योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जळगाव जिल्ह्यात धरणगावात उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचं उद्घाटन आणि जामनेर तालुक्यात गोद्री फत्तेपूर इथं गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आज झालं. त्यावेळी ते बोलत होते.
धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या प्रकल्पासाठी शासनानं ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपये मंजूर केले असून, अडीच एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.