अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं असून २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातल्या औंध इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे, ऊर्जा बचत करणारी आणि गरज असेल तेवढी ऊर्जा निर्माण करणारी आहे, असं मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
गेल्या दोन वर्षांत राज्यात ५ लाख सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून १६ हजार मेगावॉट क्षमतेचे फिडर २०२६ पर्यंत सौर ऊर्जेवर परावर्तीत करण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या वीस वर्षात वीजेचे दर ९ टक्क्यानी वाढवले आहेत, मात्र २०२५ ते २०३० दरम्यान दरवर्षी वीजेचे दर कमी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मंत्री अतुल सावे उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विविध वर्तमानपत्रात लेख लिहून केला होता, त्याला आपण लेख लिहूनच उत्तर दिलं असं मुख्यमंत्री यावेळी वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. राहुल गांधी यांनी निवडणुकीतला पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करावं. तसंच लोकांशी जोडून घेण्यात कुठे कमी पडलो हे पाहून त्यावर काम करायला हवं, असं मुख्यमंत्र्यांनी या लेखात म्हटलं आहे.