सन २०२५ २०२६ च्या पणन हंगामासाठी १४ खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. यात सर्वाधिक निव्वळ वाढ कारळासाठी ८२० रुपये प्रतिक्विंटल, त्याखालोखाल रागीसाठी ५९६ रुपये, कापसासाठी ५८९ रुपये, तर तिळासाठी ५१९ रुपये प्रतिक्विंटल असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याशिवाय मका १७५ रुपये प्रतिक्विंटल, बाजरी १५० रुपये, ज्वारी ३२८, भात ६९, तूर ४५०, मूग ८६, तर उडदासाठी ४०० रुपये प्रतिक्विंटल वाढ केली आहे. सूर्यफूल ४४१, तर सोयाबिनच्या किमान आधारभूत दरात ४३६ रुपये प्रतिक्विंटल वाढ केली आहे. त्यामुळे या खरेदीसाठी एकूण २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. या प्रकल्पांसाठी एकूण ३ हजार ३९९ कोटी रुपये खर्च येणार असून, २०२९-३० पर्यंत ते पूर्ण होतील.
२०२५-२६ साठी शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.