मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला असून तसे सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांच्या व्यतिरिक्त, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षांसोबत आघाडी करावी, याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घ्यावा, हीच आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाची भूमिका स्वच्छ नसल्याचा आरोप करून, बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका होत असतील, तर लोकशाही टिकेल का, असा सवाल त्यांनी विचारला.