बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ४७ पूर्णांक ६२ टक्के इतकं मतदान झालं होतं.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात १ हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी ७० लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं. तसंच भारत-नेपाळ सीमेवरील मैत्री एक्स्प्रेस रेल्वे सेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममध्ये डम्पा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशीच होणार आहे.