बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. एकंदर एक हजार ३१४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य तीन कोटी ७५ लाखांहून अधिक मतदार ठरवतील. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, एनडीए आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले.
पहिल्या टप्प्यात, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील १६ मंत्र्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे, त्यापैकी ११ भाजपचे आहेत. भाजपकडून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे अनुक्रमे तारापूर आणि लखीसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये आहेत. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव हे राघोपूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात केला जाणार असून निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल देखील तैनात केले जाईल.