बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोेकळा झाला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकांमध्ये मंत्रिमंडळाची रचना आणि मंत्रिपदांबाबत चर्चा सुरू आहे. आघाडीत भाजपाकडे सर्वात जास्त ८९ आमदार असून नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे ८५ आमदार निवडून आले आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे १९, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे ४ उमेदवार निवडून आले आहेत.
संयुक्त जनाता दलाचे आमदार आज पाटणा इथं होणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतील. भाजपदेखील आजच नेता निवडणार असून त्यानंतर रालोआची एकत्रित बैठक होईल. २० नोव्हेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाटण्यातल्या गांधी मैदानावर होणार आहे.