बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी झालं असून राजकीय पक्षांना अजूनही काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात, असं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यानंतर ते आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलत होते. सखोल पुनरीक्षण नियमानुसार झालं असून साडे तीन लाख लोकांनी आपणहून मतदार यादीतून आपलं नाव वगळण्याची विनंती केली असं ज्ञानेश कुमार म्हणाले. सखोल पुनरीक्षणात मतदाराची ओळख पटवण्यासाठी आधारच्या समावेशाबाबत प्रश्न विचारला असता, आधार हा नागरिकत्वाचा नाही तर केवळ ओळखीचा पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याआधी निवडणुकीच्या तयारी संदर्भात पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत निवडणूक आयोगाची बैठक झाल्याचं ज्ञानेश कुमार यानी सांगितलं. मतदारांना पंधरा दिवसांच्या आत मतदान ओळखपत्र दिलं जाईल, कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार नसतील असं त्यांनी स्पष्ट केलं. ईव्हीएमवर उमेदवाराचं रंगीत छायाचित्र असेल तसंच मतदाराला मतदान केंद्राच्या दारापर्यंत मोबाईल नेता येईल असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं.