लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला बीड जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यातल्या कारखेल बुद्रुक गावात एका तरुणाचं लग्न जुळवण्यासाठी काही लोकांनी पावणे सहा लाख रुपये घेतले होते. मात्र नवरी मुलगी लग्नानंतर तरुणाकडे राहायला येत नाही हे पाहून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
वडवणी इथल्या एका ऊसतोड कामगार तरुणाकडूनही या टोळीने लग्न जुळवण्यासाठी तीन लाख रुपये घेतले. मात्र नवरी मुलगी लग्नानंतर दोनच दिवसात पळून गेली. या प्रकरणी तपास केला असता फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली. नागरिकांनी खात्री झाल्यानंतरच लग्न करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.