केंद्रसरकारने सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमा शुल्कात कपात केली आहे. आता या उत्पादनांवर २० टक्क्यांऐवजी १० टक्के सीमाशुल्क आकारलं जाईल. या निर्णयामुळं खाद्यतेलांच्या किंमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल आणि एकंदर महागाई रोखण्यास मदत होईल, असा विश्वास ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं व्यक्त केला आहे.
शुल्क कमी केल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल प्रक्रीया उद्योगालाही प्रोत्साहन मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. खाद्य तेलउत्पादक कंपन्यांनी सीमाशुल्कातल्या बचतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन सरकारने केलं आहे.