राजधानी दिल्लीत राहणाऱ्या सुमारे 900 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून योग्य पडताळणीनंतर त्यांना परत पाठवलं जाणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कागदपत्रं नसलेल्या स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या भारत सरकारच्या ‘पुश-बॅक’ धोरणांतर्गत गेल्या ६ महिन्यांत दिल्लीतील सुमारे 700 बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशला परत पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष आय़ुक्त देवेशचंद्र श्रीवास्तव यांनी दिली.
अनेक राज्यांमध्ये बेकायदेशीररीत्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई तीव्र झाली आहे. या काळात, दिल्लीसह महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि गोव्यातून अशा बांगलादेशी नागरिकांना मोठ्या संख्येनं ताब्यात घेण्यात आलं आहे.