आसाममधल्या पूरस्थितीनं आणखी गंभीर रूप घेतलं असून, राज्याच्या ५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातली १ हजार २५० पेक्षा जास्त गावं पुरामुळे बाधित झाली असून, १२ हजार ६०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्रा, बराक आणि या नद्यांच्या सर्व उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. पूरग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारनं १६५ मदत छावण्या आणि १५७ मदत केंद्र उघडली आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागाला भेट देऊन मदतकार्याला आढावा घेत आहेत. रेल्वेमार्गावर पाणी साठल्यामुळे आसाममध्ये येणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
Site Admin | June 3, 2025 8:15 PM | Assam Flood
आसाममधे पूरस्थिती गंभीर, राज्यात २२ जिल्ह्यांमधल्या ५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका, पुरामुळे अकरा जणांचा मृत्यू
