आषाढ वारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसरमार्गे पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. तर,संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल.
संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात स्वागत झालं. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज संध्याकाळी अहिल्यानगरमधे पोहोचली. पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. आज शहरात मुक्काम करुन उद्या ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
राज्यभरातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. राज्यातल्या ८० शहरांतून चार हजार सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणं सायकल वरून नगरप्रदक्षिणा केली. केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. आरोग्यमय भारत या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं.