डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशभरातल्या १०३ अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं  पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. पाकिस्तान भारताबरोबरचं  थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देऊन छुपं युद्ध खेळत आहे. पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादा विरोधात एकवटल्याचं ते यावेळी म्हणाले.  यापुढे पाकिस्तानबरोबरची चर्चा केवळ पाक-व्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल, असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

 

प्रधानमंत्री मोदी यांनी आज बिकानेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या १८ राज्यांमधल्या १०३ अमृत रेल्वे स्थानकांचं उदघाटन केलं. यात महाराष्ट्रातल्या १५ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. परेल, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा ही मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकं, त्याशिवाय सावदा, लोणंद, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, देवळाली, धुळे, सावदा, चांदा फोर्ट  आणि आमगाव  या स्थानकांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या कार्यक्रमात बिकानेर-मुंबई एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला. 

 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकातून दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले. अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचं वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करणार असून, त्यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. 

 

तसंच जळगाव जिल्ह्यातल्या सावदा रेल्वे स्थानकावरून केंद्रीय क्रीडा आणि युवा  कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या कार्यक्रमात सहभागी झाल्या.  

 

आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी यांनी  पलाना इथं  सुमारे २६ हजार कोटी रुपयांच्या  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केलं. यामध्ये रेल्वे विद्युतीकरण, रस्ते पायाभूत विकास आणि स्वच्छ ऊर्जेशी संबंधित विविध प्रकल्पांचा समावेश आहे. 

 

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातली १३०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. या स्थानकांमध्ये स्थानिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसेल तसंच दिव्यांगजनांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. 

 

अमृत भारत स्टेशन्स केवळ भारताचा हजारो वर्षांचा वारसा जपणार नाहीत, तर देशभरात पर्यटनाला चालना देतील आणि युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. नागरिकांनी या पायाभूत सुविधांची स्वच्छता आणि सुरक्षितता कायम राखण्याची जबाबदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. 

 

भारतीय रेल्वेमध्ये परिवर्तनकारी सुधारणा होत असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. सरकार देशातल्या लहान रेल्वे स्थानकांवर लक्ष केंद्रित करत असून, त्यांचा पुनर्विकास करत आहे, आणि २०२७ सालापर्यंत देशभरातल्या ५०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा