भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली भूमिकेबद्दल जगाला सांगण्यासाठी गेलेल्या सात शिष्टमंडळांपैकी पाचवं शिष्टमंडळ आज भारतात परतलं आहे. काल यापैकी चार शिष्टमंडळं देशात परतली. संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा तसंच द्रमुक खासदार कन्निमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.
काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने अमेरिकेतले अग्रणी, तसंच वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय समुदायाबरोबर घेतलेल्या बैठकांमध्ये भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला देशभरातून एकमुखाने पाठिंबा मिळाल्याचं त्यांनी वॉशिंग्टन डिसी इथं अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीसोबतच्या बैठकीत स्पष्ट केलं. या समितीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत अशा प्रवृत्तींना जगात थारा नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.