दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत आहेत. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतली आणि आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना सादर केल्या. या उपक्रमातून सरकारची सर्व उद्दिष्टं साध्य झाल्याचं जयशंकर म्हणाले आणि त्यांनी या शिष्टमंडळाचं अभिनंदन केलं, अशी माहिती शिष्टमंडळाचे सदस्य, तसंच राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांनी दिली.
द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळही रशिया, लाटविया, स्लोव्हेनिया, ग्रीस आणि स्पेनचा दौरा करून परत आलं असून, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शिष्टमंडळाने काल इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बद्र अब्देलट्टी यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री अब्देलट्टी यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला इजिप्तचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लायबेरियाच्या दौऱ्यात सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत द्विपक्षीय सहकार्य बळकट केलं. जनता दल संयुक्त पक्षाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळानं क्वालालंपूर इथं आग्नेय आशिया प्रादेशिक दहशतवादविरोधी केंद्राचे महासंचालक दातिन तैब यांची भेट घेऊन भारताची सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधातील दृढ आणि तत्वनिष्ठ भूमिका स्पष्ट केली.