दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णूतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं सध्या विविध देशांच्या भेटीवर आहेत. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल फ्रान्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. दहशवादविरोधी लढ्यात संपूर्ण देशाची एकजूट असल्याचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या शिष्टमंडळातील राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी भारताला शेजारी देशाबरोबर शांतता हवी असली तरीही हल्ला झाल्यास भारत शांत राहाणार नाही, असं स्पष्ट केले. हे शिष्टमंडळ पुढे इटली, युके, जर्मनी, डेन्मार्क आणि युरोपियन युनियनला भेट देणार आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी गयानाच्या संसद अध्यक्षांची भेट घेऊन दहशतवादा विरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली.
खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळांनीही काल दक्षिण कोरिया, कुवेत, कतार, काँगो आणि स्लोव्हेनिया आदी विविध देशांच्या भेटी घेऊन दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट केली.