अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर देशात कार्यरत असलेल्या ३४ बोईंग 787 विमानांचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सखोल परिक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत आठ विमानांची तपासणी झाल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापना केली असून त्यात केंद्र आणि गुजरात राज्य सरकारमधल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या समितीला तीन महिन्यांत सर्वंकष अहवाल देण्याच्या सूचना दिल्याचंही नायडू यांनी सांगितलं.
या अपघातातल्या मृतांची संख्या अडीचशेच्या वर गेली आहे. या मृतांपैकी नऊजणांची ओळख पटली असून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती अहमदाबादचे पोलीस उप-अधिक्षक रजनीश पटेल यांनी दिली. इतरांची ओळख पटवण्यासाठी ३६ तज्ञांचं पथक दिवस रात्र डीएनए चाचण्या करत आहे.
या विमान अपघातातल्या मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना आणि जखमींना २५ लाख रुपये तातडीची मदत द्यायचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे. टाटा समूहानं या आधीच मृतांच्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला होता.
दरम्यान राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बीजे रुग्णालयाला भेट देत अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.