पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराण यांच्या पुढाकारानं आयोजित एका कार्यक्रमात 10वी आणि 12 वी मध्ये अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात महत्वाचं काम केलेल्या महिलांचे देखील यावेळी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं, अशी माहिती आकाशवाणीच्या बातमीदारानं दिली.
धुळे जिल्ह्यात देखील आज सकाळी धनगर समाज युवा संघटनांनी मोटरसायकल रॅली काढली. तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबीर आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.