महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडली. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन्ही राज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तापी मेगा रिचार्ज जगातलं एक आश्चर्य आहे. या परियोजनेमुळे महाराष्ट्राची दोन लाख ३० हजार हेक्टर आणि मध्य प्रदेशची सुमारे एक लाख ३१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात अकोला, बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांतल्या खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रावर या योजनेचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. येथील शेतकऱ्यांचं जीवन बदलणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या योजनेला आंतरराज्यीय परियोजनेअंतर्गत आणावं, अशी विनंती दोन्ही राज्यं केंद्र सरकारला करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपापल्या राज्यांच्या विकासासाठी परस्पर सहकार्याने काम करत राहू, असा विश्वास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला १९ पूर्णांक ३६ शतांश टीएमसी पाणी मिळणार असून मध्यप्रदेशला ११ पूर्णांक ७६ शतांश टीएमसी पाणी मिळणार आहे. विशेषतः नागपूर शहराची तहान भागणार आहे. ही योजना जगातली सर्वात मोठी जल पुनर्भरण योजना आहे.