जागतिक दिव्यांग व्यक्ती दिनाच्या निमित्तानं आज राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातल्या पात्र दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मिशन अस्मिता हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियानातून जवळपास १५ हजार १५८ दिव्यांग व्यक्तीची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १२ हजार ६६६ दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना लवकरच हे प्रमाणपत्र घरपोच देण्यात येणार आहेत.
सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं देखील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आणि त्यांनी बनवलेल्या आकर्षक वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ३६ शाळांनी भाग घेतला.
सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं देखील दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. ४० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्त्व असणाऱ्या व्यक्तींसोबत दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन म्हणून शासनाकडून अर्थसहाय्य दिलं जातं , त्या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा , तसंच इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं.
परभणी शहरात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संघटना, दिव्यांग शाळा, कर्म शाळा यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली. दिव्यांग संघटना, दिव्यांग शाळेतील विद्यार्थी,समाज कल्याण विभागाचे अधिकारी,आरोग्य अधिकारी या रॅलीसाठी उपस्थित होते.
नांदेडमध्ये आज बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता.