दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णूतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचली आहेत. या प्रतिनिधिमंडळानं इथिओपिया मधले संसद प्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती आणि आफ्रिकी संघ आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. भारताला नियंत्रण रेषेच्या पलीकडून असलेला दहशतवादाचा धोका आणि देशात सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची माहिती त्यांना शिष्टमंडळाने दिली.
भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. भारत आपली भूमिका परिणामकारकपणे मांडेल आणि इतर तीन देशांप्रमाणेच लंडनमध्ये देखील भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे.