मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणावर २४ जुलै रोजी सुनावणी होईल. मुंबईत ११ जुलै २००६ रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले.
काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले. या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच, कबुलीजबाब या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला यश आलं नाही असं न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं यावेळी स्पष्ट केलं. या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं.