महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतराराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथं होत आहे. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला १९ पूर्णांक ३६ शतांश टीएमसी पाणी मिळणार असून मध्यप्रदेशला ११ पूर्णांक ७६ शतांश टीएमसी पाणी मिळणार आहे. तापी नदीच्या तीन प्रमुख प्रवाहातून कालवे काढून संबंधित क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचेल.
या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना पाण्याचा लाभ मुळणार असून विशेषतः नागपूर शहराची तहान भागणार आहे. ही योजना जगातली सर्वात मोठी जल पुनर्भरण योजना असल्याचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं. कराराच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. महाराष्ट्रातली २ लाख ३४ हजार ७०६ हेक्टर जमीन तर मध्यप्रदेशातली १ लाख २३ हजार ८२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकरल्पात कोणत्याही गावाचं विस्थापन होणार नाही असं यादव यांनी सांगितलं. ही योजना केंद्रसरकारच्या जलसिंचन योजनांमधे समाविष्ट करावी अशी वनंती आपण केंद्रसरकारला करणार असल्याचं ते म्हणाले.