आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळानं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी ‘सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास’ अभियान सुरू केलं आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. परिवहन विभागानं दिलेल्या सूचनांनुसार प्रवाशांनी काही बाबींचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार, बसमध्ये बसल्यानंतर प्रवाश्यांनी बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पाहून ठेवावेत, आपत्कालीन दरवाज्यासमोर सामान ठेवू नये, हातोडी आणि तिचा वापर माहिती करून घ्यावा आणि संकटाच्या वेळी घाबरूंन न जाता शांतपणे कृती करावी, असं सांगण्यात आलं आहे.