पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशात २४४ ठिकाणी उद्या मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रिय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणांमधे मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे. त्याखेरीज ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रील घेण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेतली. नागरी संरक्षण विभागाचे महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
हल्ला झाला तर सुरक्षेच्या दृष्टीनं करण्याच्या हालचालींविषयी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, नियंत्रण कक्ष, इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची आज भेट झाली. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे ४० मिनिटं महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली.