संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद देण्याच्या अनुषंगानं सैन्य दलांच्या तयारीचा आढावा घेण्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झालेली ही भेट जवळपास ४० मिनिटं सुरू होती. २२ एप्रिलला झालेल्या या हल्ल्यात विविध राज्यातले २६ पर्यटक मारले गेले.
जनरल चौहान यांनी या बैठकीत संरक्षण मंत्र्यांना दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी लष्करानं आताच्या या घडीला आखलेली व्यूहरचना आणि युद्धसज्जतेसंदर्भात माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. संरक्षण सज्जतेबाबत काल दिल्लीत गृह मंत्रालयातही बैठक झाली, त्या बैठकीला सीमा सुरक्षा दलाचे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान भारतीय नौदलाद्वारे नौकाविरोधी क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करण्याचा यशस्वीरीत्या सराव करण्यात आला. कुठल्याही क्षणी, कुठल्याही स्थळी युद्धासाठी नौदल सज्ज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.