राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विक्रोळी भागात काल संध्याकाळी झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. लातूरमध्ये काल संध्याकाळी झाडावर वीज कोसळून दोघे मृत्युमुखी पडले, तर सहा जण गंभीर जखमी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस आहे आणि मे महिन्यात पावसामुळे एकंदर ३२ लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, लांज्यात भिंत कोसळून एक जण ठार झाला, इतर तिघे जखमी झाले, तर गुहागरमध्ये झाड कोसळून तीन जण जखमी झाले.
नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये काल दरड कोसळली होती.त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम झाला होता. तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केली आहे. इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. काल रात्री सुरगाणा तालुक्यात सादूडने इथं वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यात काल तीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत तालुक्यातील वालवड मंडळात आणि कर्जत मंडळात झाली.
धाराशीव जिल्ह्यालाही काल पावसाने झोडपून काढलं. अहिल्यानगरमध्येही काल रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे भिंत कोसळून एक महिला ठार झाली.
परभणी जिल्ह्यात पावसामुळे पपई आणि आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता.
हवामान विभागानं आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट दिला आहे. इथं वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्या या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.