पर्यावरण रक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा होत आहे. १९६९ साली युनेस्कोच्या शिखर परिषदेत झालेल्या ठरावानंतर १९७० मध्ये पहिला जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. ‘आपली शक्ती, आपला ग्रह’, ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे.
पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर जागरूकता वाढवणं आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देणं, हे वसुंधरा दिनाचं उद्दिष्ट आहे. यंदाची संकल्पना शाश्वत ऊर्जेकडे वळण्याची तातडीची गरज अधोरेखित करते आणि व्यक्ती, समूह आणि सरकारांना २०३० सालापर्यंत स्वच्छ ऊर्जेची निर्मिती तिप्पट करण्याचं आवाहन करते. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं, तसंच शाश्वत, समन्यायी आणि समावेशी ऊर्जा भविष्यासाठी गुंतवणूक करणं कसं महत्वाचं आहे, हे या मोहिमेतून अधोरेखित होतं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वी माता विकास आणि उत्क्रांतीची परिसंस्था जपण्यासाठी जीवसृष्टीचं संगोपन करत असून हे ऋण फेडण्यासाठी मानवानं पृथ्वी ग्रहाचं आरोग्य जपायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे.