वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेत दुसऱ्या दिवशी आज जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या सत्राचं उद्घाटन करताना म्हणाले. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं.
संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करते असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. संस्कृतीच्या वैविध्याला आपण पाठिंबा द्यायला हवा, असंही ते म्हणाले. माहिती आणि प्रसारण राज्यंमत्री एल मुरुगन यावेळी उपस्थित होते.
या सत्रात ७७ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. माध्यमांमधून पसरणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालायला हवा यावर सर्व प्रतिनिधींचं एकमत झालं.
भारत-अमेरिका सर्जनशीलता परिसंस्थेला चालना देण्यासाठी वेव्हज् परिषदेत सत्र आयोजित करण्यात आलं. अमेरिकेचे काऊन्सलर माईक हँकी यांनी या सत्राचं उद्घाटन केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं.
भारताने आपलं तत्त्वज्ञान, ज्ञान आणि शिकवणीच्या आधारे जगाच्या ज्ञानात भर टाकली, असं उद्योजक निता अंबानी म्हणाल्या. त्या वेव्हज् परिषदेत एका चर्चासत्राला संबोधित करत होत्या. भाषा, साहित्य, संगीत आणि वैद्यकीय ज्ञान अशा सर्वच क्षेत्रात भारतानं जगाला भरीव योगदान दिलं आहे, असं त्या म्हणाल्या.